श्रेष्ठ राज्यकर्ते व थोर समाजसुधारक म्हणुन समाजात सर्वत्र आदराने ज्यांचे नाव घेतले जाते ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज. केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा नव्हे तर कोणत्याही काळात प्रत्येकाने आदर्श मानावे असे त्यांचे चरित्र. त्यांचा वारसा पुढे नेण्यास अत्यंत अभिमान वाटतो. केवळ अभिमान नाही तर ही एक मोठी जबाबदारी आहे याची जाणीवही सतत मनात असते.
तत्कालीन समाजातील अनेक अनिष्ट रूढी परंपरांवर आपल्या आधुनिक व प्रखर विचारांचे आसूड ओढत, प्रसंगी प्रस्थापितांचा रोष पत्करत छत्रपती शाहूंनी समाजात अनेक सकारात्मक बदल घडविले. समाजात सुधारणा घडवायची असेल तर सर्व समाज सुशिक्षित झाला पाहिजे हे ओळखून त्यांनी प्राथमिक तसेच उच्च शिक्षणाच्या सोयी निर्माण करण्यास आरंभ केला. आज त्यांचा हा वारसा पुढे नेत समजाच्या सर्व स्तरापर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी मी कटिबद्ध आहे.
छत्रपती शाहूंना लोकराजा, रायतेचा राजा म्हणून संबोधले जाई. त्यांची ही प्रतिमा जनतेच्या मनात त्यांच्याविषयी असणारे प्रेम, आदरभाव दर्शविते. शासकाविषयी जनतेच्या मनात धाक असणे हे सर्वत्र दिसून येते परंतु त्याचबरोबर जनतेचे प्रेम, आपुलकी, विश्वास मिळविणारा राज्यकर्ता विरळाच. जनतेसाठी काम करताना त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांचे पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस वंदन करून सदैव जनसेवेसाठी सज्ज राहण्याचा, त्यांचा वारसा पुढे नेण्याचा मी संकल्प करतो.