परिचय

परिचय

बालपण व शिक्षण

कागलच्या घाटगे घराण्यात १९ जानेवारी १९८३ रोजी समरजितसिंह यांचा जन्म झाला. घाटगे घराणे हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे होय. या कुटुंबाने कायम शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपला आहे. यामुळे बालपणापासूनच त्यांच्यावर समाजकारणाचे संस्कार झाले. सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व राजे विक्रमसिंह घाटगे हे त्यांचे वडील व उच्चविद्याविभूषित श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे या त्यांच्या मातोश्री. आपल्या माता-पित्यांचे संस्कार व कडक शिस्त यांचे बाळकडू घेत भगिनी तेजस्विनी यांच्यासह त्यांचे बालपण गेले. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून व त्यानंतर वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुण्यामधून सीए पूर्ण केले व पुण्यामध्येच इंटर्नशिप केली. कुटुंबातून मिळालेले संस्कार व शिक्षणामुळे येणारी प्रगल्भता समरजितसिंह यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येते.



कौटुंबिक परिचय

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे बंधू श्रीमंत पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज हे कागल संस्थानचे अधिपती होते. त्यांचे सुपुत्र व कागलचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे हे समरजितसिंह घाटगे यांचे आजोबा. सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व राजे विक्रमसिंह घाटगे हे त्यांचे वडील व उच्चविद्याविभूषित श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे या त्यांच्या मातोश्री. हेमलता राजे या समरजितसिंह यांच्या आत्या आहेत. श्रीमंत प्रवीणसिंहराजे घाटगे व स्व. दिलीपसिंहराजे घाटगे हे समरजितसिंह यांचे चुलते होत. स्व. दिलीपसिंहराजे यांच्या नावाने कर्णबधीर संस्था स्थापन करून स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी त्यांच्या स्मृती जपल्या आहेत. समरजितसिंह यांना सुविद्य पत्नी सौ. नवोदिता यांची समाजकारणात मोलाची साथ मिळत आहे. या दांपत्यास आर्यवीर हा पुत्र आहे.



व्यावसायिक कारकीर्द

समरजितसिंह हे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा)चे सभापती म्हणून सक्षमपणे कार्यरत होते. सन २०१५ मध्ये त्यांनी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली तसेच श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकपदी त्यांची निवड झाली. दररोज एक लाख लिटर दूध हाताळणी क्षमता असणारा अत्याधुनिक डेअरी प्लॅंट हे या कंपनीचे वैशिष्ट्य. उत्तम गुणवत्ता आणि स्वाद यामुळे या ब्रॅंडने बाजारात दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळविली. समरजितसिंह या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. याबरोबरच शाहू ग्रुप संचालित कागल बँक व शैक्षणिक संस्थेसाठी त्यांचे नेतृत्व नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे.



समाजकारण

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचला. त्या काळात त्यांनी समाज हिताच्या अनेक योजना राबविल्या. शिक्षण, शेती, क्रीडा, कला, व्यापार उद्योग, सामाजिक ऐक्य यांसारख्या बाबींचे महत्व काळाच्या पुढे जाऊन ओळखणार्‍या छत्रपती शाहूंचा वारसा घाटगे घराणे प्राणपणाने चालविते आहे. पिताश्री विक्रमसिंह घाटगे यांना आदर्श मानून समरजितसिंह यांचा समाजकारणातील प्रवास सुरू आहे.

माणसांना जोडून घेत समरजितसिंह यांची वाटचाल सुरू आहे. सर्वांविषयी आपुलकी व सर्वांना समजून घेऊन त्यांच्यासाठी काम करण्याचा स्वभाव, यामुळे त्यांना लोकांचा चांगला पाठिंबा लाभत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील जनतेशी मिळून मिसळून वागण्याची आवड असल्यामुळे येथील जनतेलाही समरजितसिंह यांच्याविषयी विशेष आपुलकी वाटते.

कागल तालुका व परिसराचा सर्वार्थाने विकास घडावा यासाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत. आपल्या वडिलांचे समाजकार्य पुढे नेण्याच्या उद्देशाने त्यांनी राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनची स्थापना केली. हे फाऊंडेशन सामाजिक, शैक्षणीक, आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात अविरत कार्यरत आहे. समरजितसिंह फाऊंडेशनच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळत असून त्यांनी स्वतःला फाऊंडेशनच्या कामात झोकून दिले आहे. महिलांना पाठबळ मिळावे यासाठी राजमाता जिजाऊ संस्था ही संस्थाही जोमाने कार्य करत असून सौ. नवोदिता या कामात वैयक्तिक लक्ष देत आहेत.



राजकारण

स्व. विक्रमसिंहराजेंच्या अकाली निधनानंतर झालेली शाहू कारखान्याची निवडणूक समरजितसिंह यांनी विक्रमी मतांनी जिकली. त्यांना मिळत असलेल्या बळकट जनाधाराचे हे द्योतक होते. यानंतरच्या कालावधीत राजे बँक व कृषी संघ या शाहू परिवारातील संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्यांनी बिनविरोध यश मिळविले. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाला प्राधान्य देणार्‍या उमेदवारांना पाठबळ देत विजय मिळवून दिला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. कागल तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकाही त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पार पडल्या. कागल - कोल्हापूर भागातील एक युवा व खंबीर नेतृत्व ही समरजितसिंह घाटगे यांची नवी ओळख घडते आहे.

01

शिक्षण


चांगले शिक्षण माणसाला ओळख मिळवून देते. केवळ सुशिक्षितच नाही तर सुसंस्कृतही बनविते. यासाठी समाजात शिक्षणाविषयी जागृती घडवून आणणे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सोई जर आपल्या गावात मिळू लागल्या तर त्यांच्यामध्ये शिक्षणाची इच्छा, उमेद निर्माण होण्यात निश्चितच मदत मिळेल. उत्तम शिक्षणाच्या सोई गावोगावी उपलब्ध करून देणे.

02

रोजगार


कोल्हापुरात विविध व्यवसायांना चालना देऊन त्याद्वारे रोजगार निर्मिती करणे. कोल्हापुरातील तरुणांना व महिलांना स्थानिक पातळीवर व्यवसाय व नोकरीच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने येथील एकंदर जीवनमान उंचावण्यास मदत मिळेल.

03

पर्यटन


कोल्हापूर जिल्हा व परिसर पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. देवस्थाने, ऐतिहासिक वास्तू, हवामान, चवदार खाद्यपदार्थ, वैशिष्ट्यपूर्ण शेती व अन्य उत्पादने यांमुळे दूरवरून येणारे पर्यटक कोल्हापूरकडे आकर्षित होतात. पर्यटनाच्या दृष्टीने या भागाचा अधिक विकास घडवून आणणे. पर्यटन क्षेत्रात कोल्हापुरास अव्वल स्थान मिळवून देणे.

व्हिजन
जलसमृद्ध व्हावी भूमी, माती सुपीक कसदार, बहरून यावी शेती,
सदैव वाढत राहो कागल, गडहिंग्लज, उत्तूर परिसराची महती
TOP